नाशिक – भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून नुकतीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी किसान रेल सुरु केली आहे. त्यामुळे शेतीमालची वाहतूक होऊन शेतकऱ्यांचा माल देशभरातील विविध भागात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या मोजक्याच रेल्वे स्थानकावरून शेतमाल जात आहे. पण किसान रेलचे थांबे मोठ्या प्रमाणात वाढले तर अजूनही शेतकऱ्यांचा माल भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना विनंती करुन लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समिति ही आशिया खंडातील मोठी बाजार समिति असल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल हा देशातील नव्हे तर जगभरात विक्री साठी पाठविला जातो. त्यासाठी किसान रेल्वेचा अधिकृत थांबा लासलगांव येथे व्हावा म्हणून खा.डॉभारती पवार यांनी डी.आर.एम.भुसावळ यांचेकडून मागणी केली होती. याचाच परिपाक म्हणून किसान रेलला लासलगांव स्टेशनवर थांब्याला हिरवा कंदील मिळाल्याचे रेल्वे विभागाचे पत्र प्राप्त झाले असून हा थाम्बा पुढील आठवड्यात अधिकृत होणार आहे. त्याबद्दल त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल व डी.आर.एम.भुसावळ यांचे विशेष आभार मानत अशाच प्रकारे निफाड़ येथेही मोठ्या प्रमाणात शेतीमाल उपलब्ध असल्याने त्याबाबत देखील थांबा मिळणे संदर्भात सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. त्या संदर्भात लवकरच रेल्वे अधिकार्यांच्या उपस्थितीत निफाड़ येथील शेतकरी व्यापारी वर्गाशी चर्चा करुन हा थांबा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही खा.डॉ.भारती पवार यांनी सांगितले.