औंरगाबाद ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना वैद्यकीय तसेच आर्थिक संरक्षण देण्याची आग्रही मागणी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या निर्देशानुसार उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तरुण तडफदार पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कोरोना प्रादुर्भावाने नुकत्याच झालेल्या तसेच यापूर्वी लातूर जिल्ह्यातील गंगाधर सोमवंशी आणि बीड येथील संतोष भोसले यांचे दुःखद निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातील पत्रकार वैद्यकीय तसेच आर्थिक पातळीवर असुरक्षित असल्याकडे लक्ष वेधले आहे. रायकर यांच्यासारख्या हरहुन्नरी पत्रकाराला रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन मिळू शकले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून शासनाच्या हतबलतेवर बोट ठेवले आहे. राज्यात राजकारण्यांना वेगळा व पत्रकारांसह सर्वसामान्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याचा घणाघाती आरोप गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शासकीय अनास्थेचे बळी हे सर्व पत्रकार ठरल्याचा दावा गायकवाड यांनी केला असून त्यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना काळात वार्तांकनाचे चोख कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा पातळीवरील आयसोलेशन रुग्णालयात 50 बेड आरक्षित ठेवून त्यांना प्रत्येकी 50 लाखांचे विमा संरक्षण देण्याची आग्रही मागणी गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विनोद हिंगमीरे
औरगाबाद पञकार