नांदगाव ( निखिल मोरे )गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले आहे.श्रावण महिना सुरू होऊन श्रावण सरींना सुरुवात झाली आहे. पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध् ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा 7 जुनला पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी वेळेवर पुर्ण केली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असता शहरासह तालुक्यात चौफेर गुरुवारी सायंकाळी पावसाने धुव्वाधार हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळणार आहे.शेतकऱ्यांनाही सुखद दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. तालुक्यातील शेत शिवारात मजूरांची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामातील मका, बाजरी, ज्वारी,कपाशी, भुईमूग आदी पिकांना खतांची आवश्यकता असते.मात्र गेल्या काही दिवसापासून बाजारातून युरीया गायब झाल्याने शेतकऱ्यांची युरीयासाठी दमछाक होत आहे.
कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात युरीया मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.मात्र दुकानात युरीया शिल्लक नसल्याचे दुकानदार सांगत आहे. युरीयाची तांत्रिक टंचाई निर्माण झाली आहे.काय?असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.पिकांना खते कसे द्यावे, असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.कृषी विभागाच्या
“शेतकऱ्यांच्या बांधावर खते ”या योजनेचा बोजवारा उडाला आहे.पिकांना वेळेवर खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.वरुनराजाने समाधानकारक हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.कृषी विभागाने युरीया खतांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.