शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

0

मुंबई : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे, असे प्रतिपादन केले.श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान, आणि वीरता असलेला हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम दूरदृष्टी पहिली. नौसेना उभी करून समुद्र तटाचेदेखील रक्षण कसे करावे हे दाखवून दिले. शिवरायांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेत स्वराज्य निर्मिती केली. महाराजांच्या या विचाराचे आचरण केल्यास देशाचे कल्याण होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळामध्ये अखंड हिंदुस्थानचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केले.ना. ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण म्हणून संबोधले होते, तर बडोद्याचे राजे सयाजी गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज यांनी शिवरायांचा विचार डोळ्यासमोर ठेवून महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला चालना दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज हे  युगप्रवर्तक होते. त्यांनी केवळ राजगादी किंवा राजसत्ता स्थापन केली नाही तर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना त्यांनी हृदयात जपली होती. आगरी, कोळी, रामोशी, धनगर, मुस्लीम अशा जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला आणि तो तडीस नेला. पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. त्यांच्या आरमाराचा अभ्यास आजही जगातील अनेक देशांची नौदले करत आहेत.” रायगडावरील राजसदरेवर आयोजित करण्यातया अभिवादन कार्यक्रमाला महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास अभ्यासक डॉ . उदय कुलकर्णी, निवृत्त व्हॉईस ॲडमिरल मुरलीधर पवार, तानाजी मालुसरे – सूर्याजी मालुसरे यांचे वंशज रवींद्र मालुसरे, अनिल मालुसरे,  श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, कार्यवाह सुधीर थोरात, सरकार्यवाह पांडूरंग बलकवडे, स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतिवर्षी किल्ले रायगडावर होणारी ही वारी आपल्या आयुष्याची कर्तव्यपूर्ती असल्याची विनम्र भावनाही त्‍यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व शिवभक्तांनी चालूवर्षी दाखवलेली मोठी संख्या पाहता त्यांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळातही किल्ले रायगडावर होणाऱ्या विविध कार्यक्रमांतून तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्‍यांनी केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा शिवतीर्थावर गौरव ! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचा कवड्याची माळ, धारकरी पगडी आणि भंडारा सन्मानपूर्वक देऊन शिवतीर्थ रायगड येथे सन्मान करण्यात आला,उपस्थित असलेल्या समस्त मालुसरे यांच्यावतीने रवींद्र मालुसरे (अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ), यांनी हा सन्मान स्वीकारला. सिंधीया यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा आपल्या भाषणात दिला.यावेळी राज्याच्या विविध ७२ गावातून सुमारे शेकडो मालुसरे पुण्यभूमी रायगड येथे एकवटले होते. २५ एप्रिल १८९६ या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे व येसाजी कंक यांच्या वंशजांचा नारळ देऊन रायगडावर सन्मान करण्यात आला होता त्यानंतर १२७ वर्षांनी पुन्हा एकदा मालुसरे वंशजांचा सत्कार शिवतिर्थ रायगडावर करण्यात आला. सर्वश्री सर्वश्री रवींद्र तुकाराम मालुसरे अनिल मालुसरे,मिलिंद मालुसरे (साखर),  सुभाष मालुसरे, सपना मालुसरे, अनिल मालुसरे (पारमाची), नितीन मालुसरे, सुनीता मालुसरे  (गोवा), प्रदीप मालुसरे(कासुर्डी), संतोष मालुसरे (लव्हेरी), सुनील मालुसरे (सुधागड), शिवराम मालुसरे (किये), संजय मालुसरे (धुळे),  बाळासाहेब मालुसरे(निगडे), मधुकर मालुसरे ((भावे पठार), भगवान मालुसरे (आंबेशिवथर), अरुण मालुसरे (हिरडोशी भोर), संतोष मालुसरे (फुरुस ),राकेश अ मालुसरे, सूर्याजी द मालुसरे, अनिल मा मालुसरे (गावडी ), रमेश मालुसरे, तुकाराम मालुसरे (आंबे शिवथर), विजय मालुसरे (एरंडवाडी) आबासाहेब मालुसरे, मंगेश मालुसरे (गोडवली), अनिल मालुसरे (बडोदा), संतोष शा मालुसरे (खोपोली), महीपत मालुसरे, गेणू  मालुसरे, सोनल म मालुसरे,  (पारमाची), अरुण मालुसरे,  धोंडिबा मालुसरे, सुनीता अ मालुसरे-सरपंच (हिरडोशी), आदी प्रमुख मालुसरे वंशजांचा याप्रसंगी मंडळाच्या वतीने सन्मान केला.समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ. उदय कुलकर्णी यांना या वेळी देण्यात आला, तर सैन्यदल अधिकारी व्हाईस अ‍ॅडमीरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायमुद्रा आणि शिवऋषींची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक तर  सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर राज्य सदरेपासून शिवसमाधीपर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here