सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) गेल्या अनेक वर्षापासून हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या मोहरम सणानिमित्ताने अजिंठा येथे काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आल्याचे पत्र ग्रामपंचायतीने पोलिस प्रशासनाला दिले आहे.सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे परंपरेनुसार अनेक वर्षापासून मोहरम या सणानिमित्ताने ६० ते ६५ च्या जवळपास सावा-या बसवल्या जातात.२५ ऑगस्ट रोजी सवा-यांची स्थापना होऊन २७ ऑगस्ट पासून २९ ऑगस्ट पर्यंत दररोज रात्री सवा-यांची मिरवणूक निघून दिनांक ३० रोजी विसर्जन व करबलाची नमाज पठण असे कार्यक्रमाचे स्वरूप असते.या सवा-या बघण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातुन हजारो नागरिक येत असतात.परंतु यावर्षी संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावलेले असताना शासनाच्या निर्देशानुसार कोरोना काळात सर्व सामाजिक,राजकीय व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. जेणेकरून कोरणा या संसर्गजन्य आजाराचा फैलाव कमी करता येईल.
शासनाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण आहेर यांनी केलेल्या आवाहनाला सर्व समाजबांधवानी प्रतिसाद देत सवा-या मालक व मोहरम कमिटी यांनी एकमुखी निर्णय घेऊन सर्व सवा-या आपापल्या घरी बसून मिरवणूक न काढता जागेवरच विसर्जन करत असल्याबाबतचे पत्र अजिंठा गावचे उपसरपंच महंमदखा पठाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन मुंडे व अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण आहेर यांना दिले आहे.