सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) शहरासह तालुक्यातील वाढत्या कोरोणा रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती विरोधात आता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जी व्यक्ती मास्क वापरणार नाही त्यांच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.दंड न भरल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा असे आदेश उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून कोरणा या संसर्गजन्य आजार आहाकार सुरूच आहे. अनेक उपाययोजना करूनही शहरासह ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढतांना दिसत आहे. कोरणाच्या पार्श्वभूमीवर कडक उपाययोजना लागू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी श्री ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस सिल्लोड तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे,बालाजी ढगारे, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. वाघमारे, उपविभागीय अभियंता सय्यद साजिद,नगर परिषद प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी,प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख प्रतिनिधी महसूल मंडळ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरणा रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती विरोधात आता दंडात्मक कारवाई व रॅपीड अॅटिजेन टेस्ट वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
दंड वसूल करण्यासाठी १३ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यात शहरात ०१ तर ग्रामीण भागात ११ पथकांचा समावेश राहणार आहे. या पथकावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरी भागात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक व ग्रामीण भागात गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे,
या दंड वसुलीबाबतचा दैनंदिन अहवाल दररोज दुपारी चार वाजेपर्यंत विहित नमुन्यात पथक प्रमुखांनी तर सनियंत्रण प्रमुखांनी इतर जबाबदारी सांभाळून वरिष्ठांना द्यायचा आहे.असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.मंगळवार रोजी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौक येथे सदरील पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली.यावेळी विनामास्क शहरात कामानिमित्त येणाऱ्या व घराबाहेर पडणा-या नागरिकांची अचानक चौकातील पथकासमोर आल्यानंतर चांगलीच धांदल उडाली.दरम्यान अनेक नागरिकांनी तोंडाला मास्क लावले नसल्यामुळे त्यांना दंडाची पावती भरावी लागली.
जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मास्क लावणे सक्तीचे आदेश दिल्यानंतर प्रत्येक गावात दवंडी व अलाऊसींग करून नियमित मास्क वापरणे संबंधी सुचना दिलेल्या आहेत.