पुणे : हजारो अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांच्यावर पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली. सामाजिक कार्यकर्त्या , आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना.माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व वात्सल्यमयी व्यक्तिमत्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला .त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले, हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर गर्दी वाढताना दिसत आहे.सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच महाराष्ट्र सरकारकडून त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. त्याआधी 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते,