पहिली ते बारावी च्या अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात – वर्षा गायकवाड

0

मुंबई – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना संकटामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यात येत आहे. ऑनलाईन शिकवणीमध्ये वेळेचा व्यत्यय आणि येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांना पुर्ण अभ्यासक्रम शिकवणे अवघड होते. यामुळे मागील वर्षीही २५ टक्के अभ्यासक्रम कपात करण्यात आला होता. यावर्षीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रत्यक्ष सुरु करणं अवघड आहे यामुळे शिक्षकांकडून पुन्हा अभ्यासक्रम कपात करण्याची मागणी होती. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम २५ टक्के कपात केला असल्याची घोषणा केली आहे.कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना संकटास सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये सुद्धा ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा मुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने २५% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती जाहीर करण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here